mangalagauri pooja aarti kahani 2025 in marathi : यंदाची मंगळागौर करा अनोख्या पद्धतीने
mangalagauri pooja aarti kahani in marathi : श्रावण महिना आला की नवीन लग्न झालेल्या मुलींना उत्सुकता असते ती मंगळागौरीची. नवीन लग्न झालेल्या मुली पहिली 5 वर्ष मंगळागौर करतात. या मंगळागौरीच्या पूजा मध्ये सर्व बायका आनंदाने सहभागी होतात. नववधूच्या गोड कौतुकाचा असलेला हा सण. त्याचबरोबर अनेक बायकांचा विरंगुळा आणि आनंद देणारा सण म्हणजे मंगळागौरीचा सण आहे.
mangalagauri pooja aarti kahani आपण या लेखाच्या माध्यमातून मंगळागौरीची पूजा कशी करावी? मंगळागौरीचे व्रत कसे आचारावे? मंगळागौरीच्या दिवशी काय करावे? काय करू नये? याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचबरोबर मंगळागौरीची कथा, आरती आणि गाणी देखील आज आपण या लेखाच्या माध्यमातून पाहणार आहोत.
mangalagauri pooja aarti kahani 2025 यावर्षी म्हणजेच 2025 मध्ये श्रावणात मंगळागौर किती आल्या आहेत. कोणत्या तारखेला मंगळागौर आहे. याची माहिती देखील आपण आज पाहणार आहोत.
यावर्षी 25 जुलै रोजी श्रावणाला सुरुवात झाली आहे. पहिली मंगळागौर 29 जुलै रोजी आली आहे. त्याचबरोबर यावर्षी मंगळागौरीच्या दिवशी नागपंचमी देखील आहे. पूर्वी विवाहित बायका नागदेवतेला आपला भाऊ मानून पूजा करत असत.
आपल्या सौभाग्यासाठी प्रार्थना करत. नागपंचमीच्या आदल्या दिवशी मेहंदी काढतात. योगायोगाने यावेळी पहिली मंगळागौर त्याच दिवशी आल्याने महिलांचा आनंद गगनात मावेनासा झालेला आहे.
2025 मधील मंगळागौरीच्या तारखा
- 29 जुलै 2025
- 5 ऑगस्ट 2025
- 12 ऑगस्ट 2025
- 19 ऑगस्ट 2025
मंगळागौर व्रताचे महत्त्व
mangalagauri imformation in marathi
mangalagauri imformation in marathi मंगळागौर हे सौभाग्याचे व्रत आहे. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी मंगळागौरीचे व्रत केले जाते. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे मंगळागौर आहे. नवविवाहित महिलांसाठी मंगळागौरीचे विशेष महत्त्व आहे.
या दिवशी विविध पारंपारिक खेळ, गायन, नृत्य केले जाते. या दिवशी महिला देवी पार्वती आणि भगवान शंकर महादेवाची पूजा करतात. हे व्रत करताना महिला सकाळी स्नान करून संकल्प करतात आणि मंगळागौरीची पूजा, कथा आणि आरती करतात.
संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यावर व्रत पूर्ण केलं जातं काही महिला या दिवशी उपवास करून फक्त फळ, दूध घेतात.
मंगळागौरीची पूजा कशी करावी
मंगळागौरीची पूजा करण्यासाठी नवविवाहित स्त्रियांनी सकाळी लवकर उठून स्नान करावे. त्यानंतर सवळे नेसून पूजा करावी. सर्वप्रथम गणपतीची पूजा केली जाते. त्यानंतर लग्नातील अन्नपूर्णेची धातूची मूर्ती चौरंगावर स्थापित करावी. त्या शेजारी महादेवाची पिंड ठेवावी. नंतर कणकेच्या दिव्यांची आरास सजवावी. देवीला विविध झाडांची पाने, फुलं वहावी, नंतर तांदूळ, पांढरे तीळ, जिरे, मुगाची डाळ अशा धान्याची मूठ अर्पण करावी.
मंगळागौरीची कहाणी वाचावी. नैवेद्य अर्पण करावा. दिव्यांनी आरती करावी. महिलांना पूजेसाठी आमंत्रित करून हळदीकुंकू द्यावं आणि रात्रभर जागरण कराव. हे जागरण करताना महिला रात्रभर फुगड्या, झिम्मा, पिंगा, बस फुगडी, टिपऱ्या, खेळून रंगीत दोऱ्यांच्या गोफ विणणे असे अनेक प्रकारचे खेळ खेळतात आणि पारंपारिक गाणी म्हणली जातात.
मंगळागौरीची कथा
mangalagaur kahani
mangalagaur kahani आटपाट नगर होतं. तिथं एक वाणी होता. त्याला काही मुलगा नव्हता. त्याच्या घरी एक गोसावी येई. अल्लख म्हणून पुकार करी. वाण्याची बायको भिक्षा आणी. “निपुत्रिकाच्या हातची भिक्षा घेत नाही,” असें म्हणून तो चालता होई.
ही गोष्ट तिनं नवर्याला सांगितली. त्यानं तिला युक्ति सांगितली. “दाराच्या आड लपून बस, अल्लख म्हणतांच सुवर्णाची भिक्षा घाल.” अशी भिक्षा झोळीत घातली. बोवाचा नेम मोडला. बाईवर फार रागावला. मूलबाळ होणार नाहीं असा शाप दिला.
तिनं त्याचे पाय धरले. बोवांनी उःशाप दिला. बोवा म्हणालें, “आपल्या नवर्याला सांग. निळ्या घोड्यावर बस. निळा वस्त्रं परिधान कर. रानांत जा. जिथं घोडा अडेल तिथं खण. देवीचं देऊळ लागेल, तिची प्रार्थना कर. ती तुला पुत्र देईल.” असं बोलून बोवा चालता झाला. तिने आपल्या पतीला सांगितलं.
वाणी रानांत गेला. घोडा अडला, तिथं खणल. देवीचं देऊळ लागलं. सुवर्णाचं देऊळ आहे. हिरेजडिताचे खांब आहेत. माणकांचे कळस आहेत. आंत देवीची मूर्ती आहे. मनोभावें पूजा केली. त्याला देवी प्रसन्न झाली, “वर माग” म्हणाली. “घरंदारं आहे, गुरंढोरं आहेत. धन द्रव्य आहे; पोटीं पुत्र नाहीं, म्हणून दुःखी आहे.” देवी म्हणाली, “तुला संततीचं सुख नाहीं, मी प्रसन्न झाले आहे तर तुला देते.
अल्पायुषी पुत्र घेतलास तर गुणी मिळेल, दीर्घायुषी घेतलास तर जन्माध होईल. कन्या घेतलीस तर बालविधवा होईल. इच्छा असेल तें मागून घे.” त्यानं अल्पायुषी पुत्र मागितला. देवीनं “माझ्या मागच्या बाजूस जा. तिथं एक गणपति आहे. त्याच्यामागं आंब्याचं झाड आहे. गणपतीच्या दोंदावर पाय दे, एक फळ घे, घरी जाऊन बायकोला खाऊ घाल म्हणजे तुझा कार्यभाग होईल.” असं सांगितलं. नंतर देवी अदृश्य झाली.
वाणी देवळामागं गेला, गणपतीच्या दोंदावर पाय दिला, झाडावर चढला; पोटभर आंबे खाल्ले; मोटभर घरीं नेण्याकरितां घेतले. खालीं उतरून पाहूं लागला, तो आपल्या मोटेत आंबा एकच आहे. असं चार पांच वेळा झालं.
गणपतीला त्रास झाला. त्यानं सांगितलं, “तुझ्या नशिबीं एकच फळ आहे.” फळ घेऊन घरी आला, बायकोला खाऊ घातलं, ती गरोदर राहिली. दिवसमासां गर्भ वाढू लागला. नवमास पूर्ण झाले. वाण्याची बायको बाळंतीण झाली. मुलगा झाला. उभयतांना मोठा आनंद झाला. दिवसामासां वाढूं लागला. आठव्या वर्षी मुंज केली. दहाव्या वर्षी लग्न करा म्हणाली.
काशीयात्रेशिवाय लग्न करणं नाहीं असा माझा नवस आहे. असा जबाब दिला. काही दिवसांनी मामाबरोबर यात्रेस पाठविलं. मामाभाचे काशीला जाऊ लागले. जातां जातां काय झालं? वाटेनं एक नगर लागलं. तिथं काही मुली खेळत होत्या. त्यांत एकमेकीचं भांडण लागलं. एक गोरी भुरकी मुलगी होती, तिला दुसरी मुलगी म्हणूं लागली, “काय रांड द्वाड आहे! काय रांड द्वाड आहे! तेव्हा ती मुलगी म्हणाली, ‘माझी आई मंगळागौरीचं व्रत करते, आमच्या कुळवंशामध्ये कोणी रांड होणार नाही.
मग मी तर तिची मुलगी आहे.” हे भाषण मामानं ऐकलं त्याच्या मनांत आलं हिच्याशी भाच्याचं लगीन करावं, म्हणजे हा दीर्घायुषी होईल. परंतु हें घडतं कसं ? त्याच दिवशीं तिथं त्यांनीं मुक्काम केला. इकडे काय झालं ? त्याच दिवशीं त्या मुलीचं लग्न होतं.
लग्नाचे वेळेस नवरा मुलगा आजारी झाला. मुलाच्या आईबापांना पंचाईत पडली. पुढं कोणी तरी प्रवासी मिळेल तर बरं होईल, त्याला पुढं करून वेळ साजरी करूं, म्हणून धर्मशाळा पाहूं लागले. मामाभाचे दृष्टीस पडले. मामापासून भाच्याला नेलं. गोरज लग्न लाविलं.
उभयतांना गौरीहरापाशी निजवलं. दोघं झोंपीं गेलीं. मुलीला देवीनं दृष्टांत दिला. “अग अग मुली, तुझ्या नवर्याला दंश करायला सर्प येईल, त्याला पिण्याकरितां दूध ठेव. एक कोरा करा जवळ ठेव. दूध पिऊन सर्प क-यात शिरेल. आंगच्या चोळीनं तोंड बांधून टाक. सकाळीं उठून आईला तें वाण दे.” तिनं सर्व तयारी केली. दृष्टांताप्रमाणं घडून आलं.
कांही वेळानं तिचा नवरा उठला. भूक लागली म्हणूं लागला. लाडू खायला दिले. फराळ झाल्यावर त्यानं तिला आपली अंगठी दिली. पहाटेस उठून ताट घेऊन बि-हाडी गेला. मामाभाचे मार्गस्थ झाले. दुसरे दिवशीं काय झालं? हिनं सकाळीं उठून स्नान केलं, आपल्या आईला वाण दिलं. आई उघडून पाहूं लागली, तों आंत हार निघाला. आईनं कन्येच्या गळ्यांत हार घातला.
पुढं पहिला वर मांडपांत आला. मुलीला खेळयला आणलं. ती म्हणाली, “हा माझा नवरा नाहीं. मी त्याचे बरोबर खेळत नाहीं.” रात्रीची लाडवांची व आंगठीची खूण कांहीं पटेना. आईबापांना पंचाईत पडली. हिचा नवरा कसा सापडतो ? नंतर त्यांनी अन्नछत्र चालू केलं. जो ब्राह्मण येईल त्याचे पाय आंगठी घालून मुलीनं धुवावे, आईनं पाणी घालावं, भावानं गंध लावावं, आणि बापानं विडा द्यावा, असा क्रम चालू केला, शेंकडो लोक येऊन जेवूं लागले.
इकडे मामाभाचे काशीस गेले. पुष्कळ दानधर्म केला. तीर्थयात्रा केल्या. ब्राह्मणांचे आशीर्वाद घेतले. एके दिवशी भाच्याला मूर्च्छा आली. यमदूत प्राण न्यायला आले. मंगळागौर आडवी झाली. त्या दोघांचं युद्ध झालं. यमदूत पळून गेले. गौर तिथं अदृश्य झाली. भाचा जागा झाला, तसा आपल्या मामाला सांगूं लागला, “मला असं असं स्वप्न पडलं.” मामा म्हणाला, “ठीक झालं. तुझावरचं विघ्न टळलं. उद्यां आपण घरी जाऊ.” परत येऊ लागले.
लग्नाच्या गावी आले. तळ्यावर स्वयंपाक करू लागले. दासींनीं येऊन सांगितलं. “इथं अन्नछत्र आहे तिथं जेवायला जा.” ते म्हणाले, “आम्ही परान्न घेत नाहीं.” दासींनीं यजमानणीस सांगितलं. त्यांनी पालखी पाठवली. आदरातिथ्यानं घरी नेलं. पाय धुतांना मुलीनं नवर्याला ओळखलं. नव-यानं आंगठी ओळखली. आईबापांनीं विचारलं. “तुझ्याजवळ खूण काय आहे?” त्यांनं लाडवांचं ताट दाखवलं. सर्वांना आनंद झाला.
भोजनसमारंभ झाला. मामाभाचे सून घेऊन घरीं आले. सासूनं सुनेचे पाय धरले. “तुझ्यामुळं माझा मुलगा वाचला,” असं म्हणाली. तिनं सांगितलं. “मला मंगळागौरीचं व्रत असता. ही सगळी तिची कृपा.” सासर माहेरचीं घरचींदारचीं माणसं सर्व एकत्र झाली, आणि त्या व्रताचं उद्यापन केलं.
तिला जशी मंगळागौरी प्रसन्न झाली, तशी तुम्हां आम्हां होवो, आणि आपलं सौभाग्य अखंड राहो, इतकीच देवाची प्रार्थना करा. ही धर्मराजाला कृष्णानं सांगितलेली साठां उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरईं सुफळ संपूर्ण.
मंगळागौरीची आरती
mangalagauri aarti
जय देवी मंगळागौरी। ओंवाळीन सोनियाताटीं।।
रत्नांचे दिवे। माणिकांच्या वाती। हिरेया ज्योती।।धृ।।
मंगळमूर्ती उपजली कार्या। प्रसन्न झाली अल्पायुषी राया।।
तिष्ठली राज्यबाळी । अयोषण द्यावया। ।1।।
पूजेला ग आणिती जाईजुईच्या कळ्या । सोळा तिकटीं सोळा दूर्वा।।
सोळा परींची पत्री । जाई जुई आबुल्या शेवंती नागचांफे।।
पारिजातकें मनोहरें । नंदेटें तगरें । पूजेला ग आणिली।।2।।
साळीचे तांदुळ मुगाची डाळ। आळणीं खिचडी रांधिती नारी।।
आपुल्या पतीलागीं सेवा करिती फार ।।3।।
डुमडुमें डुमडुमें वाजंत्री वाजती। कळावी कांगणें गौरीला शोभती।।
शोभली बाजुबंद। कानीं कापांचे गवे। ल्यायिली अंबा शोभे।।4।।
न्हाउनी माखुनी मौनी बैसली। पाटाबाची चोळी क्षीरोदक नेसली।।
स्वच्छ बहुत होउनी अंबा पुजूं लागली ।।5।।
सोनिया ताटीं घातिल्या पंचारती। मध्यें उजळती कापुराच्या वाती।।
करा धूप दीप। आतां नैवेद्य षड्रस पक्वानें । तटीं भरा बोनें ।।6।।
लवलाहें तिघें काशीसी निघाली। माउली मंगळागौर भिजवूं विसरली।।
मागुती परतुनीयां आली। अंबा स्वयंभू देखिली।।
देउळ सोनियाचे । खांब हिरेयांचे। कळस वरती मोतियांचा ।।7।।
मंगळागौरीची गाणी
पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा !
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, रात जागवली पोरी पिंगा !
फेटा बांधल्याला भाऊ माझा ग जावई तुझा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, झोप चाळिवली पोरी पिंगा !
शालू नेसल्याली भैन माझी ग सून तुझी ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मागं घालिवली पोरी पिंगा !
भाऊ माझा ग, तो ब राजा ग, अग जा जा ग पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवली, मला बोलिवली पोरी पिंगा !
तुझ्या भावाचं डोळं चकणं ग, रूप हेकणं ग पोरी पिंगा
भैन माझी ग लेक इंद्राची कोर चंद्राची पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं नाक नकटं ग त्वांड चपटं ग पोरी पिंगा
माझ्या भावाचा भारी दरारा पळती थरारा सारे पिंगा !
भाऊ तुझा ग भितो झुरळाला, काळ्या उंदराला पोरी पिंगा
भैन माझी ग जशी कोकिळा गाते मंजुळा पोरी पिंगा !
तुझ्या भैनीचं काय नरडं ग कावळं वरडं ग पोरी पिंगा
अशा भैनीला कोण आणणार कशी नांदणार पोरी पिंगा !
भैन माझी ग जाई बावरून घेई सावरून पोरी पिंगा
तुझ्या पिंग्यानं मला बोलिवलं, लुगडं नेशिवलं पोरी पिंगा !
नाच ग घुमा, कशी मी नाचू ?
ह्या गावचा, त्या गावचा सोनार नाही आला
जोडवी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा शिंपी न्हाई आला
चोळी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
ह्या गावचा, त्या गावचा कासार न्हाई आला
बांगडी न्हाई मला कशी मी नाचू ?
नाच ग घुमा !
फू बाई फू फुगडी चमचम् करतीया बुगडी !
पाट बाई पाट चंदनाचा पाट
पतीदेव बघत्यात माडीवर वाट
बारा घरच्या बायका एक जागी मिळू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
लेक बोलते लाडकी घरी गोकूळ साजणी
वसुदेव देवकीचा कान्हा खेळतो अंगणी
बाळ नवसाचा माझा त्याची दृष्ट काढू या
चला झिम्मा खेळू या ग चला झिम्मा खेळू या !
घुमु दे घागर घुमु दे खेळात जीव ह्यो रमु दे
गडनी घागर फुकतीया, मागं नि म्होरं झुकतीया
नाचून बाई माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
घुमु दे घागर घुमु दे !
आंबा पिकतो रस गळतो
कोकणचा राजा झिम्मा खेळतो.
झिम पोरी झिम कपाळाचा भीम
भीम गेला फुटून पोरी आल्या उठून
सरसर गोविंदा येतो.
मजवरी गुलाल फेकीतो
या या झिम्मा खेळाया
आमच्या वेण्या घालाया.
एक वेणी मोकळी
सोनाराची साखळी.
घडव घढव रे सोनारा.
माणिकमोत्यांचा लोणारा.
लोणाराशी काढ त्या
आम्ही बहिणी लाडक्या.
एक लिंबू झेलू बाई दोन लिंब झेलू
दोन लिंब झेलू बाई तीन लिंब झेलू
तीन लिंब झेलू बाई चार लिंब झेलू
चार लिंब झेलू बाई पाच लिंब झेलू
पाचा लिंबाचा पानोठा
माळ घालू हनुमंता
हनुमंताची निळी घोडी
येता जाता कमळे तोडी
कमळाच्या पाठीमागे लागली राणी
अग अग राणी इथे कुठे पाणी
पाणी नव्हे यमुना जमुना
यमुना जमुनाची बारीक वाळू
तेथे खेळे चिल्लार बाळू
चिल्लार बाळाला भूक लागली
निज रे निजरे चिलार बाळा
मी तर जाते सोनार वाडा
सोनार दादा सोनार दादा
गौरीचे मोती झाले का नाही
गौरीच्या घरी तांब्याच्या चुली
भोजन घातले आवळीखाली
उष्ट्या पत्रावळी चिंचेखाली
पान सुपारी उद्या दुपारी
कीस बाई कीस दोडका कीस
दोडक्याची फोड लागते गोड
आणिक तोड बाई आणिक तोड
कीस बाई कीस दोडका कीस
माझ्यान दोडका किसवना
दादाला बायको शोभना
कीस बाई कीस दोडका कीस
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा कसर नाही आला
बांगड्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा सोनार नाही आला
पातल्या नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा माळी नाही
आला वेणी नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
या गावचा त्या गावचा शिंपी नाही आला
चोळी नाही मला कशी मी नाचू
नाच ग घुमा कशी मी नाचू
खुंटत मिरची जाशील कैशी
आई बोलवते ह्याबर करिते
बाबा बोलावतात ह्याबर करितात
सासू ओलाविते ह्याबर करिते
सासरा बोलवितो ह्याबर करितो
बाल बोलविते ……… ( सुटून तेव्हा पतीचे नाव घेते)
मंगळागौर व्रताचे उद्यापन
मंगळागौरीच्या व्रताचे उद्यापन लग्न झाल्यापासून पाचव्या वर्षी श्रावणातील शेवटच्या मंगळवारी केले जाते. असे शक्य नसल्यास इतर कोणी मंगळागौर व्रताचा थाट मांडला असल्यास त्यासोबत व्रताचे उद्यापन करता येतं. पुण्याहवाचन ठेवण्याकरिता होमहवनासाठी भटजींना बोलावतात. त्याच ठिकाणी द्यायचे वाण ठेवतात. आई वडिलांना वाण दिले जाते. मुलीने आईला सापाची मूर्ती देण्याची पद्धत आहे. तर आईने मुलीला आणि जावयाला ताटामध्ये लाडू किंवा वड्या घालून देण्याची पद्धत आहे. यामागे मंगळागौरीची पारंपरिक कथा आहे. या कहाणीतला नवरदेव अल्पायुषी असतो. त्याला दंश करण्यास साप येतो. पण त्या नववधूच्या मातेने मंगळागौरीचे व्रत केल्याने हा नवरदेव वाचतो. त्यावेळी त्या सापाचे रूपांतर हारात होते. म्हणून याच्या उद्यापनाला आईला वाण म्हणून यामध्ये एकसर (काळेमणी आणि सोन्याचा मणी) जोडवी, कूंकू, कंगवा आरसा असे दिले जाते. वडिलांना उपरणे, शर्ट, धोतर, टोपी देतात.